ट्रक – दुचाकीच्या भीषण अपघातात तिघा भावंडांचा मृत्यू, खड्डा चुकविण्याचा नादात घडला अपघात, अकोली शिवारातील हृदय हेलवणारी घटना,
जिंतूर शहरापासून 3 किमीच्या अंतरावर असलेल्या अकोली शिवारातील रस्त्यावर खड्डा चुकविण्याचा नादात दुचाकी व ट्रकमध्ये घडलेल्या भीषण अपघातात दोन सख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय हेलवणारी घटना सोमवार 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास समोर आली. मयत तिन्ही भावंडे मालेगाव येथील रहिवासी असल्यामुळे समस्त ग्रामस्थांवर शोककळा पसरली होती. सदरील भीषण अपघाताविषयी सविस्तर वृत्त असे की जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला 18 वर्षीय अभिषेक काशीनाथ म्हेत्रे हा आपल्या 15 वर्षीय योगेश काशीनाथ म्हेत्रे या सख्या भावाला शहरातील जवाहर विद्यालयात सोडण्याकरिता व 20 वर्षीय रामप्रसाद विश्वनाथ या चुलत भावाला कामावर सोडण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच 26 ऐ व्हि 2834 वर जिंतूरच्या दिशेने निघाला होता. अकोली शिवारातील पुलाजवळ खड्डा चुकविण्याचा नादात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक क्रमांक एम.एच.18 बि.जी.6270) वर तिघे जण जोरात आदळल्याने ट्रकने तिघांना चेंगरत नेले. सदरील भीषण अपघातात दोन सख्या भावंडांसह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोफने, पोलीस निरीक्षक दीपक शिंदे सपोनि गायकवाड पो.काॅ गायकवाड, आदींच्या पथकाने मालेगाव ग्रामस्थ नागरिक पांडुरंग मुसळे, तुकाराम थिटे, ज्ञानेश्वर पांचाळ, सामाजिक कार्यकर्ता नागेश आकात,व रुग्णवाहिका चालक अरूण घुगे यांच्या मदतीने मयताचे शव शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्खे व एक चुलत भावंडांचा आघातात जागीच मृत्यू झाल्याने मालेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.