सकाळी ज्याच्या विरोधात बातमी आली…दुपारी त्याच्याच गाडीने पत्रकाराला उडविले :पत्रकाराच्या खुनाचा संशयराजापूर येथील घटनेची चौकशी करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी.

राजापूर जिल्हा रत्नागिरी :सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो.. हा योगायोग असू शकतो? तर नक्कीच नाही.. हा ठरवून घडवून आणलेला घातपात असून त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य प्रमुख एस.एम देशमुख यांनी केली आहे.. या प्रकरणी आरोपीस अटक केली गेली असली तरी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी देखील मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.. घटना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरची… काल राजापूर येथे थार आणि दुचाकी अपघात होऊन त्यात पत्रकार शशिकांत वारीसे हे गंभीर जखमी झाले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघाताची दुसरी बाजू समोर आल्यानंतर अपघातात मृत झालेल्या शशिकांत वारीसे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे.काल सकाळी ८ वा. ३ मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारीसे यांनी रिफायनरी ग्रुपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. “मोदिजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ब्यानरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो” अशा आशयाची ती बातमी होती.. बातमीचे कात्रण ही वारीसे यांनी सकाळी ग्रुपवर टाकले होते. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी लावलेल्या ब्यानर संदर्भात हि बातमी होती. यानंतर दुपारी १.१५ च्या दरम्यान राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या महेंद्र थार गाडीने पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत वारीसे गंभीर जखमी झाले होते. अधिक उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले.

◾ नातेवाईकांचा आरोपवारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा यामध्ये मृत्यू होतो हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.रत्नागिरी येथील पत्रकारांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.. सर्व पत्रकार आज सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेत आहेत.. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील या प्रकाराचाी चौकशी करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *